मुंबई. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी व पालकांत परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती स्थापण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली केले.
ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून सादर करतील. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी संगितले.
विद्यापीठात मल्टिपर्पज लॅब सुरू
राज्यात अकृषी विद्यापीठांमध्ये विविध आजारांसंदर्भातील चाचण्या घेता येतील, अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब सुरू करण्याच्या सूचनाही सामंत यांनी केल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र, राज्य शासन व आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील. राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत
आरोग्य यंत्रणेच्या सहकार्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का, याचा सर्व विद्यापीठांनी विचार करावा. काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने एनएसएसच्या २७ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सज्ज केले. याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये एनएसएसचे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी घेता येतील का, यासाठीचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मंत्री सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंना केल्या आहेत.